Saturday, 14 July 2012

अष्टविनायक पदयात्रेने आम्हास काय दिले......

अष्टविनायक  पदयात्रेने आम्हास काय दिले ?.
                          १) मानसिक   समाधान
                          २) आत्मिक बळ 
                          ३) मानवी स्वभावाचे असामान्य दर्शन
                          ४) जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन .
                          ५) शारीरिक क्षमता चाचणी
                          ६) सामाजिक सन्मान

आम्ही कूठे कमी पडलो!
                           १) एकमेका मधील एकात्मतेचा अभाव
                            २)पौष्टिक आहाराची उणीव
                            ३)वेळ आणि अंतराचे बंधन जास्त झाले.
                            ४) अधिक सराव हवा होता

विघ्नेश्वर- ओझर- 7 आणी गिरिजात्मज-लेण्याद्री- 8

२-३-९५ गुरुवार

सर्व तयारी करून बाहेर पडायला उशीर झाला होता. मंदिराची किल्ली देण्यास श्री. शिंदे ह्यांचे कडे गेलो. चहाचा आग्रह झाला. इतर मंडळी जमा झाली होती. गाववेशी पर्यंत सोडायला मंडळी आली होती. आता पारगाव ;शिगवे; नागापूर; रांजणी मार्गे नारायणगाव गाठ्वायाचे होते. एकूण ३२ किमी. अंतर होते. इप्सित जवळजवळ येत होते. वाटेत नास्ता झाला पारगावला १२.३० ला पोहचलो. येथे घोडनदी व मीना नदीचा संगम आहे. नदीवर बांध आहे. स्नान आटोपले. गणेश वस्ती आली, इथे श्री.करंडे ह्यांनी शेजाऱ्या कडून गरम भाकऱ्या करवून घेतल्या व आम्हास जेवू घातले. रांजणगावापासून सौ.सुनीताचे पायावर थोडी सूज आली होती, दोन्ही गुडघे दुखत होते त्यामुळे गती कमी झाली होती. उठबसकरताना त्रास होत होता पण एकदा उभे राहील की चालता येत होतं! नारायणगाव पर्यंत जाणे जरुरीचे होते कारण तेथे बऱ्यापैकी हॉटेल मिळणार होते. सूर्यास्त झाल्यावर प्रवास बन्द हा नियम आज मोडला. गावात लाईट नव्हते. धनगरी कुत्र्यांचा त्रास वाढला. एस. टी. डेपो जवळ नंदनवन हॉटेलमध्ये रूम घेतली. संडास ,बाथरूम कॉमन व गरम पाण्याचा अभाव. हॉटेल नंदनवन सारखे भासले नाही. पहाटे थोडी थंडी जाणवली. रात्री इतके थकलो होतो की जेवण पण केले नाही. आमचे शरीर म्हणजे चालणारे यंत्र अशी अवस्था झाली होती. उद्या जिद्दीने शेवटची चढाई करायची होती. अंतर कमी होतं व मानसिक तणाव कमी झाला होता.

३-३-९५ शुक्रवार
                     नारायणगाव --ओझर हे अंतर फक्त १२ किमी आहे. सकाळी उशिरा निघालो बाहेर टपरीत चहा घेतला. आमचा हॉटेलचा अनुभव ऐकून तो टपरीवाला म्हणाला" नुसते नावाचे नंदनवन", मालक अजिबात लक्ष घालत नाही. नोकर शिरजोर  झाले आहेत.
रस्ता डांबरी होता दोन्ही बाजूस घनदाट नव्हे पण तुरळक झाडी होती. बागायती जमीन म्हणून हवा पण गार होती. आर्वी ह्या सॅटेलाइट केंद्राचे अॅनटेना चारी बाजूस दिसत होते. हळूहळू ओझर जवळ आले. कुकडी नदीचे पाणी व मंदिराचा कळस दिसू लागला पण पूर्ण वळसा घेवून मंदिरात पोहचण्यास १०-३० झाले. गरम पाणी, राहण्याची सोय झाली. शुचिर्भूत  होऊन  विघ्नेशाचे दर्शन घेतले.  

सौ.सुनीताच्या  पायावरील सूज वाढली होती. मंदिरातून येताना एक आयुर्वेदिक औषधाचे दुकान दिसले होते. ह्या सुजेवर जर दुख:दबाव  लेप लावला तर ? सुनीताला तर झोप लागली होती. बाहेर पडलो लेप घेवून आलो आणि तिच्या पायाला, गुडघ्याला व घोट्याला लेप लावला. क्रेप बान्डेज बांधलं. औषधाची गोळी दिली. जेवणाची काही सोय होते का हे बघण्यास बाहेर पडलो. जेवण नाही पण मिठाई अन फळे मिळाली .  थोडी विश्रांती घेतली.३-३० चे सुमारास पुन्हा एक वार दर्शन केले आणि कालव्याचे बाजूने लेण्याद्रीला जाण्यास निघालो आतापावेतो जवळजवळ ५०० किमी. अंतर पार झाले होते शेवटचे काही किमी. बाकी होते. तेच अंतर फार आहे असे वाटत होते. म्हणतात ना शिजेपर्यंत धीर धरवतो पण निवेपर्यंत नाही. आमचीही गत तशी झाली होती. सभोवार द्राक्षाचे मळे होते. हिरवीगार वनश्री होती. वाटेत १०वी  इयत्ते तील  काही मुली भेटल्या. त्याचे समवेत गप्पा मारीत श्रीमती शकुंतलाबाई जाधव ह्यांच्या १५ एकरांच्या द्राक्ष मळ्यावर पोहचलो. दृष्ट लागावा इतका तो छान होता.  त्यांचा चहाचा आग्रह झाला. पण द्राक्षांचा मोह सोडवला नाही. थॉमसन सीडलेस ,काळी साहेबी हे दोन प्रकार चाखले. हातात एक एक किलोचा घड ठेवला व "जाता जाता खा म्हणजे रस्ता पण लवकर संपेल" असे म्हणाल्या!

हळूहळू सूर्यास्ताची वेळ आली.संध्या रंगात शिवनेरी व लेण्याद्री  ह्या दोन्ही गडांना  सोनेरी मुलामा चढला. गडावरील अवशेष दिसू लागले पण लेण्याद्री पायथा अजून ३ किमी. दूर होता. उठबस करीत शेवटची १०० मी .चढण पूर्ण करून सौ सुनिता थांबली. माझे सामान तिचे जवळ देवून मी विश्वतांच्या ऑफिस मध्ये गेलो.  आमचा वृतांत ऐकून  मंडळी मंत्रमुग्ध झाली. सगळी सोय उत्तम होईल ह्याची हमी दिली; चहा दिला व सामान वाहून नेण्यास एक माणूस बरोबर दिला. जवळच्या हॉटेल मध्ये मुंबईहून आलेल्या यात्रेकरूंचे जेवण होत होते. त्यात आमची वर्णी लागली. ८-३० वाजता चारीठाव सुग्रास भोजन मिळाले. आमचे ध्येय शिखर तर आम्ही गाठले होत! पण साध्य नव्हत झालं! त्यासाठी सकाळ पर्यंत वाट पहावी लागणार होती. इतक्यात सौ.सुनीताने एक पाटी दाखविली त्यावर लिहिले होते "समय से पहिले और तकदीरसे ज्यादा कुछ नाही मिलेगा ". तो जणू आम्हांला संदेश वाटला .खोलीवर आलो व झोपी गेलो .

४-३-९५ शनिवार

सकाळी ४ वा.जाग आली. मुंबईकर पुढच्या प्रवासाला निघणार होते. गरम पाण्यासाठी भट्टी पेटली होती. त्याचा आवाज शांतता भंग करीत होता. आम्हांला घाई नव्हती. ७ वा उठलो, तयारी केली. गरमगरम कांदे पोहे ,चहा  तयार होता. आस्वाद घेतला आणि लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली. ८-१५ सुमारास वर पोहचलो.

गिरिजात्मजाचे  दर्शन झाले, लोटांगण घातले, जमिनीवर लोळू लागलो. डोळ्यात  अश्रूंची दाटी झाली. अन् मन शांत झाले. अथर्वशीर्ष  म्हटले, आरती केली ,ॐकर जप केला. यात्रा पूर्ण केल्याचा आनंद आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर झळकू लागला. जिद्दीने यात्रा पूर्ण केली म्हणून सौ. सुनीताचे अभिनंदन केले. संत तुकोबाची वाणी आठवली "ह्याचसाठी  केला अट्टाहास........
 श्री चरणी एकवार वंदन करून पायऱ्या उतरू लागलो.  ११ वा .जुन्नरला जाणारी गाडी आली. तेथून कल्याण व नंतर दुपारी  ५-३० ला डोंबिवलीला पोहचलो. ग्रामदेवतेचे दर्शन करून घरी पोहचलो. चि .समीर व चि.सौ सुषमा आनंदित झाले. सुनीताचा ताबा सुषमाने घेतला व पायाच्या दुखण्यावर उपचार सुरु झाले!
सर्वत्र कौतुक झाले ,मनाला उभारी आली ..................

.श्री चरणी अर्पण ..

महागणपती - रांजणगाव - 6

२७-२-९५    सोमवार   (महाशिवरात्र)

सिद्धटेक मुक्कामी रात्री झोप तर छान झाली. लोकांनी केलेल्या कौतुकाने अंगावर मुठभर मांस चढले होते.
६-३० वाजता श्रीं च दर्शन घेतले. भीमेच्या काठावर आलो पण अजून नावाड्याचा पत्ता नव्हता. इतक्यात २-३ गावकरी आले, त्यांनी नाव किनारी आणली. त्यांचे बरोबर वल्ही कशी मारावयाची हे शिकत नदीपार केली. उतरताच सिद्धीविनायाकास हात जोडले अन पावले लिंपणगावाकडे चालू लागली .वडगाव इथे एका मळ्यात उसाचे गुऱ्हाळ चालू होते. सौ. सुनीताला ते बघावयाचे होते. आत शिरलो, मंडळीना रामराम घातला. लगेच विचार पूस झाली,अन रसाची लोटी हाती आली. भट्टी सकाळी २वा.सुरु होते. रात्री १०पर्यंत चालते. एक काहिली रस आटविण्यास ४-५ तास लागतात. गुळाची ढेप कशी पडतात ते ही पाहीले. डोक्यात सामान्य ज्ञानाची,पोटात रसाची,आणि ब्यागमध्ये ताज्या गुळाची भर पडली. नमुना म्हणून! वजन वाढण्याची  भीती ! वडगाव  नंतर अज्नून आलं, वाटेत महादेवाचे दर्शनाला जाणारी मंडळी भेटत होती. आनंदवाडी फाटा ओलांडला आता मुन्डेकर वाडी अन पुढे २ कि.मी. वर लिंपणगाव. प्रवास वेळेनुसार सुरु होता. मुन्डेकर वाडीत शिरताच एक गावकरी म्हणाला त्या वडाच्या झाडाकडे जा. इतक्यात बाजूच्या घराच्या ओसरीतून हाका ऐकू आल्या हे घर म्हणजेच श्री पुरोहिताची सासुरवाडी. ओसरीवर ४ ते ६०  वर्षे वयाची १०-१२ मंडळी उभी होती. स्नान आटोपले अन २-३० वा.फराळाची ताटे समोर आली. ताटभर निरनिराळे उपासाचे पदार्थ पाहून हा थाट काही औरच असल्याचे जाणवले. वर रु ११/- दक्षिणा  मिळाली. अनाहूत पाहुण्याच्या रुपात त्यांना आम्ही शिवपार्वती भासलो असे त्यांनी सांगितले. विश्रांती नंतर हेमाडपंथी शिवमंदिरास जावून आलो. श्री कुलकर्णी (पुरोहिताचे सासरे) ह्यांचा गावात १६ खणी वाडा आहे. १० एकरात  ऊसाची लागवड आहे. गोठ्यात १०-१२ दुभती जनावरे आहेत. रात्री तेथे  थांबण्याचा आग्रह झाला अन आम्हालाही तो मोडता आला नाही. शिवाय २७ किमी इतका प्रवास झाला होताच.
२८-२-९५    मंगळवार
                               श्री.कुलकर्णी  मंडळींचा निरोप घेवून निघालो. ह्या पुढील प्रवास मात्र कोलंबसच्या प्रवासारखा होता. मार्ग अन् प्रदेश ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कुलकर्णी ह्यांच्या शेत जमिनी जवळून जाणाऱ्या कालव्या जवळून ७ किमी गेलो व काष्टी गावी पोहचलो. न्याहारी झाली पुढे निर्वी इथे गावकरी मंडळीशी बोलताना गुनाठ ह्या गावी माझ्या बहिणीकडे मुक्काम करा असे सांगून एकाने पत्र देवून मार्गदर्शन केले. कोरडी नदी ओलांडून तांदळी ह्या गावी पोहचलो. पुढे १०-१२ किमी अंतरात गाव होती पण सडकेच्या बाजूला आंतमध्ये होती. म्हणून चालत  राहिलो. इतक्यात काही गावकरी भेटले त्यांना मार्ग विचारला तेंव्हा आपण रस्ता चुकल्याचे लक्षात आले. कपाळावर हात मारून घेतला. आता काय पर्याय ? त्यांचे कडून इतकेच समजले की दोनच गोष्टी आमच्या हाती आहेत. एक तर मागे १० कि.मी. जावून योग्य मार्ग घेणे किंवा पुढे नाव्हारा फाट्या वरून रांजणगाव गाठावे. पण हे अंतर एक दिवसात पूर्ण होणे शक्य नव्हते. तेंव्हा आन्दलगाव पर्यंत जावे. पण तेथून शिरूर ला जावे. खरे तर शिरूर आमचे  मार्गात नव्हते. पण जवळचे पैसे ही संपले होते. बँकेत जाणे भाग  होते. आलीया भोगाशी. .....दुसर काय? चूक कोणाची? आधी चौकशी का केली नाही? इतका आत्मविश्वास कसा वाटला? दोघा मधील वाद मिटत नव्हता. अंतर कटत होतं. शेवटी ३८ कि.मी. अंतर पूर्ण करून आन्दलगाव गाठलं! बसने शिरूरला गेलो. बँक चे काम झाले. जैन हॉटेलमधे राहिलो.

                         खरंतर  जर आमचा मार्ग बरोबर असता तर लिंपणगाव-रांजणगाव  हे अंतर ४८ कि.मी. होते व ते दोन दिवसात पूर्ण करावयाचे होते. पण आत्ता ६० कि.मी. अंतर पार करावे लागणार होते. म्हणजे १२ किमी. किंवा ३-४ तासांचा जादा प्रवास.

१-३-९५ बुधवार.

शरीराला अन मनाला आता इतकी सवय झाली होती की खोगीर चढवता जसे घोडे फुरफुरू लागते, तसे सॅक पाठीवर घेताच पावलं अष्टविनायकाची वाट चालू लागावयाची. सिद्धटेक नंतर फक्त तीन गणपती राहिले हा विचार मनात आला की यात्रा सिद्ध होणार ह्याची खात्री वाटू लागे. आजचा रस्ता डांबरी असून बाजूस छाया देणारी झाडे होती .रस्ता चुकण्याची भीती नव्हती .कालच्या प्रसंगाची उजळणी पुन्हा एकवार मनाशी झाली. शेवटी त्या एकाट व शिंदी  वनातून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा हा छान रस्ता तर मिळाला ह्यावर समाधान मानून घेतले. वाटेत प्रवासात अनेक जैन श्रावक भेटत होते. ते अनवाणी चालतात व दिवस भरात २०-२५ किमी अंतर पार करतात. आज दिसलेले श्रावक कापडी पादत्राणे वापरत होते. एक तर व्हील खुर्चीतून जात होते.
                                 साधारण ११ वा. रांजणगावला पोहचलो. दर्शन करून एका ढाब्यावर जेवलो. परत मंदिरात आलो. वीज नसल्याने जनरेटर सुरु होता. त्या आवाजात विश्रांती शक्य नव्हती आता १२ किमी पूर्ण करून मलठणला जावयाचे होते. राज मार्ग सोडला आणि शेतीतून पठारावर आलो पठारावर झाडे तर नव्हती पण माणसांची चाहूलही नव्हती. तोंडावर येणारे सूर्य किरण त्रास देत होते .पन्हाळगड ते विशालगडला जाताना लागणारे म्हसाईचे पठार आठवले.


 उजाड भकास माळरान, तळपणारे ऊन, मरगळलेले मन ,ठणकणारे पाय अन पडलेला वारा चालण्याची गती ही वाढेना. हळूहळू अंतर कटत गेलं आणि उतार सुरु झाला. इथे सोनसंगवे नावाचे गाव लागले. गावकरी भेटले. आम्ही डोंबिवलीहून निघाल्याचे सांगताच मंडळी हसू लागली; कारण विचारले तर समजले कि येथील ५-५० जण डोंबिवली येथे राजाजी पथावर राहतात. आंब्याचे दिवसात आंबे, नाहीतर आवळे व इतर  मसाल्याचे पदार्थ विकतात. संध्या छाया पसरू लागताच वारा पण सुटला मलठण जवळ आल्याची चिन्हे दिसू लागली. गावाच्या वेशीत प्रवेश करताच जे गृहस्थ प्रथम दिसले त्यांचे जवळ "गावात रात्रीचे मुक्कामाची काही सोय होईल का?"  ही विचारणा केली. श्री शिंदे ह्यांनी राम मंदिरात सोय होईल असे सांगितले इतकेच नव्हे तर राम मंदिराची वाट दाखवली, गाभाऱ्याची किल्ली दिली आणि रात्री भोजनास घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले .चहापाना नंतर मंदिरात गेलो. ८-८.३० पर्यंत वीज येईल. तेव्हा आराम करा असे म्हणाले .थोडी थकावट दूर करण्यास हातपाय धुतले. जवळच्या मेणबत्या काढल्या त्या पेटवल्या रोषणाई झाली आणि रामरक्षा म्हणावयास सुरवात केली. काही चाहूल लागली म्हणून थांबलो तर ४-५ गावकरी मंडळी आत आली त्यांनी आमचे साठी चहा करून आणला होता. श्री. पांडुरंग शास्त्री  आठवले ह्यांचे स्वाध्याय  मंडळ  इथे आहे. आलेली मंडळी त्यापैकी होती. वीज आली, श्री शिंदे आम्हास भोजनास घेवून गेले. जेवून परत आलो तेंव्हा ही मंडळी आमचे साठी पाय शेकण्यास गरम पाणी घेवून आलेली होती. रात्री थंडी वाजू नये म्हणून काही चादरी देखील त्यांनी दिल्या. त्यांच्या ह्या प्रेमाने आम्ही उभयता भारावून गेलो आणि आमच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले. मानवी स्वभावाचे मनोज्ञ दर्शन आम्हास झाले. रात्री पायाची निगा घेवून गाढ झोपी गेलो.

Sunday, 8 July 2012

वृत्तपत्र प्रसिद्धी - Times of India

Published in  the TIMES  OF  INDIA

सिद्धिविनायक -सिद्धटेक-5

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.....


सौ. सुनीताची एक मैत्रीणीचे  (भजनी मंडळ ग्रुप मधील) श्री देशमुख हे नातेवाईक. गावाबाहेर शाळेत चौकशी केली. ते नुकतेच घरी गेले असे समजले. त्यांच्या घरी गेलो. ते अजून घरी आले नव्हते. त्याचे दोन भाऊ घरात होते . सौ देशमुख मोरगावला गेल्या होत्या . आम्ही जरी अनाहूत पाहुणे असलो तरी योग्य बडदास्त  ठेवली . सौ देशमुख  बाईना जेव्हा  मोरगावी  समजले की मुंबईचे एक जोडपे त्यांच्या घरी सुप्याला  गेले आहे तेव्हा त्या तातडीने परत आल्या . ह्या गावी पाण्याचा दुष्काळ आहे .पाण्याची सोय टॅन्करने होते.  गावात एक दर्गा आहे त्याला फार मान आहे. एक भुईकोट किल्ला आहे हिंदू व मुसलमान लोक गुण्या गोविंदाने राहतात. तुम्ही ह्या कशाची काळजी करू नका. थकला असाल! आराम करा ! घरच्या गाडीवर टाकी बसविलेली आहे शेतातून पाणी आणले जाते. त्यांच्या बोलण्याने उभारी आली. आम्ही कोण कुठले फक्त यात्रेकरू पण किती मनोभावे व आदराने सेवा करीत होते ते जाणवले . भोजना नंतर शांत झोप आली.

 २५-२-९५     शनिवार

                                 सकाळी ५-३० वा. जाग आली. स्नानासाठी  गरम पाणी तयार होते .झटपट तयारी केली. देशमुख सरांचा निरोप घेतला. सुपा ते पडवी फाटा हे ६ कि.मी. गेल्यावर, उजवीकडे वळून कुसगाव मार्गे पाटस ,दौंड कडे जाता येते. डावीकडे वळल्यास ५ कि.मी. अंतरावर नारायण बेट हे दत्त संप्रदायाचे ठिकाण आहे. आम्ही पडवी पूर्वी एक पायवाट धरली .३ कि.मी.अंतर वाचले . एका  ठिकाणी चांगला चहा  मिळाला . प्रवासात दिसून येणाऱ्या पशु पक्षांची माहिती मी सुनीतास पुरवीत होतो. अर्थात मला फार माहिती होती असे नाही पण थोडी अधिक आहे इतकच. आतापावेतो १०-१२ प्रकारचे पक्षी जे शहरांत दिसत नाहीत ते दिसले होते . तेव्हड्यात एक चितळ २०० फुटावरून  पळत आले . प्रथम मलाही ते पाळीव असेल असे वाटले .पण आम्ही  जवळ जाताच चौखूर उधळून समोरच्या  टेकडीवर नाहीसे झाले . आमच्या प्रवासात  भेटलेला हा एकमेव वन्य प्राणी. बघता बघता कुसेगाव आले . इथे श्री पांडुरंग  शितोळे ह्या निवृत्त  सैनिकाची भेट झाली . चहा झाला. आम्ही पाटस कडे निघालो साखर कारखाना दिसत होता . गेटवर छान सावली होती . थोडी विश्रांती घेतली कॅन्टीन मध्ये जेवण मिळेल हे समजले .पण पुढे ५ कि.मी. गेल्यास  गावात मनासारखे जेवण घेता येईल म्हणून पुढे निघालो. पाटस येथे छान जेवण मिळाले. दहीपण मिळाले. जेवण घेवून डांबरी सडकेने निघलो मोठ्या वृक्षांची घनदाट छाया होती. सुनिता म्हणाली देखील की "अशी छाया असेल तर दुपारचेही चालता येईल" . पण हे  भाग्य कुठलं. ५०० यार्डाचे  अंतर गेल्यावर दौंड फाटा आला. पुढे  चांगला रस्ता लागेल ह्या आशेने पुढे झालो, पण लक्षात आलं की प्रवासातील हा अत्यंत दुर्धर टप्पा. ११ कि.मी. अंतरात रस्त्याच्याकडेला छाया देणारे एक पण  झाड नव्हते . होती ती बाभळीची खुरटी  रोप . दूर एका शेतात आंब्याच्या सावलीत शेतकरी कुटुंब विश्रांती घेत होत तिथे पोहचलो. थंडगार पाणी, ओला हरभरा मिळाला. थोडी विश्रांती घेवून डोक्यावर ओले पंचे घेवून मार्गक्रमणा सुरु केली.
दौंड परिसर आता दिसू लागला होता. "दौंड हे गाव गुंडगिरीसाठी प्रसिद्ध आहे , तेव्हा जपून" ही सावधगिरीची सूचना आधीच मिळालेली होती. सावध होतो. गावात समर्थ लॉज हे उतरण्याचे एकमेव ठिकाण. नाहीतर बारामती खेरीज कुठे सोय होणार नव्हती. मिळाली ती खोली घेवून  मुक्काम ठोकला. पी .टी शूज खरेदी केले. बुटाला झिजून भोक पडले होते. घरी फोन केला. कपडे धुतले. जेवून झोपी गेलो.

२६-२-९५   रविवार
                              सकाळी ६ वा.तयार होवून बाहेर पडलो आणि शिरपूरची वाट धरली. उन्हाखेरीज कशाचा त्रास झाला नाही. प्रथम देऊळगाव व नंतर शिरपूर लागलं. दुपारचे १२ वाजत  होते. रविवारला जोडून सोमवारची महाशिवरात्रीची सुट्टी होती म्हणून मुंबई, पुणे येथील यात्रा कंपनीच्या बस गाड्या सकाळपासून आल्या होत्या. एका कंपनीची १०० माणसांची जेवणाची तयारी सुरु होती. यात्रेकरू दर्शनासाठी मंदिरात गेले होते. भीमा ओलांडून नावेने जावयाचे होते. आमच्या भोजनाची सोय  त्यांच्यामध्येच केली व तेथे मिळत असलेल्या लिंबू सरबताचे २-४ पेले रिचवले. आमच्या पदयात्रेचे वृत त्यांना कळताच, आम्हाला घेराव घातला गेला. प्रश्नोत्तरे झाली. कौतुक झाले .आमच्या मुलाच्या कंपनीतील एक सहकारी आणि मला ओळखणारे एक ,दोन जण भेटले. ४-३० वा .भीमा ओलांडून सिद्धटेक येथे पोहचलो. तिथे असलेल्या धर्मशाळेवजा लॉजमधे एक खोली घेतली. पदयात्री म्हणताच चहा फुकट व खोली भाडे ५०% सूट मिळाली . मंदिरात गेलो . गप्पा सुरु झाल्या. येथील श्री पुरोहित ह्यांनी आम्हा उभयताचे कौतुक केले. ते म्हणाले "माझी सासुरवाडी लिंपणगाव येथे आहे. हे गाव       महादेवाचे जागृत स्थान आहे. तुम्हाला ४ किमी वाट वाकडी करावी लागेल इतकेच,तुम्ही फक्त हो म्हणा! तुमची सगळी बडदास्त माझेकडे!" आम्हाला नाही म्हणवले नाही.शेजआरती नंतर मंदिरातून परत आलो.






त्याआधी संध्याकाळी धर्मशाळेत एक लग्नाचा समारंभ होता. मंडळी श्रीगोंदा येथील होती. आमच्या सारखे अनाहुत पाहुणे त्यांना आवश्यक वाटत होते. आम्हाला बरच काही अध्यात्म समजत असा त्यांचा गैरसमज झाला होता. आम्हाला भोजनाचे निमंत्रण होते. अधिक गैरसमज नको म्हणून भोजनास गेलो. नवरदेवास भेट पाकीट दिले. मंडळी फार आनंदित झाली. जेवून बाहेर आलो व एका पुस्तकाचे दुकानात काही तरी चाळत होतो इतक्यात माझे नावाने मोठमोठ्याने कुणीतरी हाक मारत होते. सौ.सुनीताला काही झाले कि काय ही भीती वाटली, आणि मी बिवलकर इथे आहे असे जोरात ओरडलो. एक गृहस्थ आले व मला कडकडून भेटले. तुम्ही अष्टविनायक यात्रा चालत करता आहात हे समजले म्हणून ही गळाभेट. "मी भाऊ बिवलकर, माझी सागर  travel   नावाची कंपनी आहे". गाडीभर यात्रेकरू त्यांच्या  कंपनी बरोबर होते.आजचा हा कितवा गणपती ? . मी म्हणालो "पाचवा ,अजून तीन बाकी आहेत.२/३ प्रवास आम्ही पूर्ण केला अजुन१/३ बाकी आहे. ३७५ किमी झाले आहे १२५ किमी अजून चालवायचे आहे तेंव्हा कसलं अभिनंदन अन कौतुक करता"!
"अरे!! असे म्हणू नका तुमची ही हिम्मत व धडाडी पाहून आम्ही थक्क झालो आहोत.तुमचे पाय धरवायाचे आहेत", ह्या वेळेपावेतो सगळ्यांनी घेरून टाकल होतं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही थकला नसाल तर आणि परवानगी असेल तर ? होकार देताच, प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
 १) ही कल्पना कशी व कधी सुचली ?
२) पद यात्रा करण्यची ही पहिलीच वेळ का ?
३)आधी सराव केला होता का?
४)दररोज किती वेळ चालता? किती अंतर पूर्ण करता ?
५)जेवणाचे काय करता ?
६) रात्री कुठे थांबता ? अजून किती दिवस लागतील ?
७)बरोबर किती वजन असते ?
८)प्रवासात त्रास कितपत झाला?
 आम्हाला प्रत्येक ठिकाणी ह्याच प्रश्नांनी भंडावलं होतं. त्यामुळे उत्तरे तयार होती. सगळ्या समवेत फोटो झाले.पत्ते, फोन नंबर ह्यांची देवाणघेवाण झाली व  मंडळीनी निरोप घेतला.

Sunday, 17 June 2012

मोरेश्वर -मोरगाव --4

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.

उरळीकांचन अजून ६-७ किमी. दूर होते. काही जवळचा मार्ग आहे का, हे विचारण्यास ; कोणी आजू बाजूस  दिसते का? हया शोधात होतो. इतक्यात पंजाबी पोशाख केलेली एक तरुणी दिसली. तिने आम्ही योग्य मार्गावर असल्याचे सांगितले आमची चौकशी केली. ती तरुणी उरळी येथील निसर्ग उपचार केंद्रात वजन कमी करण्यास आलेली होती. तिचे स्वतःचे ब्युटी पारलोर असल्याचे समजले. आमच्या रापलेल्या हाताकडे निर्देश करून ह्यावर काय करावे? असे विचारताच, सकाळी मॅाइचराइझर क्रीम वापरा ही सूचना मिळाली.

 दररोज प्रमाणे  माझी कुरकुर सुरु  झाली. तुला होणारा त्रास पाहता  तुला ही पदयात्रा जमणं कठीण दिसत  तू अधिक त्रास न घेता परत जाव असे मला  वाटते असे मी सुचवले ! पण जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही मला परत जाण्यास सांगू नका; हा सौ.सुनीताचा आग्रह. अश्या आमच्या गप्पा चालू असताना श्री मोहरील नावाचे गृहस्थ भेटले. ते यवतमाळ येथे राहणारे होते व आपल्या मेहुण्याकडे उरळीस आले असून सायंकाळचे रपेटीसाठी बाहेर पडले होते. माहेरचा पाहुणा भेटल्याचा आनंद सौ च्या चेहऱ्यावर दिसला. त्याच्याशी  गप्पामारत निघालो आणि फार्मर इन ह्या शिरीषने ठरविलेल्या हॉटेल वर कधी पोहचलो ते कळलेही नाही. हॉटेल छान होते. जेवण व राहण्याची सोय उत्तम होती.

.२३-२-९५    गुरुवार

सकाळी तयारी होताच बाहेर पडलो. पूर्ण विश्रांती नंतर फ्रेश वाटत होते. आपल्या आहारात
प्रोटीन कमी आहेत की काय?  त्यामुळेअधिक थकवा जाणवतो का ? असा विचार मनात आला .शिंदवणे गाव
मागे टाकले अन पुढे ६-७ किमी चा घाट ओलांडून जावा लागेल असे सडकेवरील पाटी सांगत होती . लहान
लहान टेकड्या दिसत होत्या. मग घाट कसा काय? लक्षात आलं की ह्या दोन तीन टेकड्या ओलांडण्यासाठी
ही पाटी असावी. १५००-१६०० फुटाची चढाई व नंतर पठार. सुनीताचे बळ वाढवावे  म्हणून रस्ता सोडून मधून
वाट कादू या का? माझा प्रश्न ! चालेल तिची संमती!अंतर जरी कमी होणार असले तरी चढ उभा होता .त्या
आधी पोटाची टाकी भरणे जरुरीचे होते. पुलाच्या सावली खेरीस कुठे छाया नव्हती. एक झाड दृष्टीस पडत
नव्हते. न्याहारी व विश्रांती नंतर एक तासात चढ पार केला पण पुन्हा जर अशी चढाई असेल तर राज मार्गाने
जाणे बरे, असे ठरवले.
"अगं! फार चढ  नव्हता. मुंब्रा येथील देवीला इतकाच तर चढ आहे !" माझे प्रोत्साहन.
 अजून वाघापूर,पारगांव गाठायचं आहे. तेव्हा, गती वाढायला हवी होती.

कुठे तरी चुकते आहे हे जाणवत होते ! वेळेचे बंधन ;अधिक अंतराचा पल्ला ; दोनच व्यक्ती ; त्यात एक स्त्री ,काय करावयास हवे होते ते समजत नव्हते. आतापावेतो माझ्या इतकच अंतर एक स्त्री असून आणि तेही माझ्याच इतक्या वेगाने- दुसरी एखादी महिला ह्या कसोटीला  उतरू शकली असती?  तिच्या ह्या जिद्दीचे आणि सहनशीलतेचे कौतुक माझ्या कडून होत नव्हते, ही तिची खंत होती. मला मात्र हवाई दलातील शिस्त व कठोर परिश्रम ह्यामुळे हे जाणवत नसे. सेनादलातील निवृत्त जवानाशी एक स्त्री कशी बरोबरी करेल ? हे मलाही समजत होतं, पण वळत नव्हतं.
  काल संध्याकाळी किती थकली होती ती ! तेव्हा तिला पटवून घरी पाठवून द्यायला हवं होतं का ? पण मीच स्वत: कबुल केलं होत की पुण्यापर्यंत जर आलीस तर तू ही यात्रा नक्की  पूर्ण करशील. आता माझा माझ्यावरील विश्वास दोलायमान झाला होता. अंतर वेळ, पोहचण्याच व निघण्याच टाइम टेबल ह्यामध्ये मन फिरत होत. त्या अष्ट विनायकाची, मुला बाळांची, नातवंडाची आठवण पण होत नव्हती. डोळ्यांना  दिसत होते ते मैलाचे दगड आणि डोक्यात होती फक्त बेरीज आणि वजाबाकी पूर्ण केलेल्या अंतराची आणि उरलेल्या मैलांची ! आठवलं म्हणून सांगतो यात्रा पूर्ण करून घरी आलो तरीपण पुढील काही रात्री स्वप्न पडायची ती देखील ह्या मैलाच्या दगडाची !

अष्टविनायकाची सहा ठिकाणं पश्चिम महाराष्ट्रा मध्ये पर्जन्य छायेच्या भागात. त्यामुळे पाऊस फार कमी. ,खुरट्या वनस्पती व लहान झाडे. मोठे वृक्ष नाहीच. काही काही वेळेस १०-१२ किमि सडकेच्या बाजूला एकही डेरेदार झाड नसायचे आणि झाडे असलीच तर बाभळीची. हे झाड छाया देवू शकते हेच कधी लक्षात आले नव्हते. कवियत्री  इंदिरा संत ह्याची बाभूळ ही कविता सौ.सुनीताने ऐकवली आणि शिरपूर व सिद्धटेक मधील बाभूळ वनाला धन्यवाद दिले. आता ऊन चांगलं जाणवू लागलं होतं. भोजन व विश्रांतीसाठी बाजूच्या एका निवांत ओसरीची निवड केली एक वृद्ध महिला सुपं-टोपल्यांना शेणमाती माखून ठेवत होती. तिची परवानगी घेवून पथारी लावली. काम आटोपून ती पाण्याची घागर घेवून आली. अर्ध्या तासाने ती परत आली आणि चहा घेण्यास घरात बोलावून नेले. प्राथमिक चौकशी झाली अन् त्यानंतर २ तास तिने आमचे बौद्धिक घेतले. ह्या वृद्ध स्त्रीने चार धाम यात्रा विना तिकीट व बरीचशी पायी केली होती. संसारातील दु:खांनी होरपळून निघालेल्या तिच्या जीवाला हेच औषध होतं. ती पुढे म्हणाली माझे मालक म्हणजे भोळे सांब मी मुलखाची  व्दाड ज्यावेळेस मनात येते तेव्हा घर सोडून यात्रेला निघून जाते. मनाला शांती लाभली की परत येते. अधून मधून खुशाली कळवते, पण पत्ता देत नाही. संत तुकारामाची गाथा पाठ ; तूकड्याची भजने पाठ ; आवाज गोड ताल व लय अंगात भिनलेली. बारा गावाचे पाणी प्यायलेली हि वृद्धा आम्हा उभयताना बरेच काही विचार करण्याजोगे देवून गेली. आमची यात्रा सफल होईल असा आशीर्वाद तर दिलाच, बाईना सांभाळून न्या. असा दम दिला. त्या शूर बाईचं नवा होत सौ .शेवंताबाई भोसले : रहणार पारगाव. ता.पुरंदर जिल्हा .पुणे.

 आता निघणं भाग होतं. बघता बघता बेलसर आलं. तिथे समजलं की शेतातून पायवाटेने गेल्यस ४-५ किमी अंतर वाचणार होतं. रस्ता चुकण्याचा प्रश्न  नव्हता  कारण जेजुरी गड सदैव दृष्टीत राहणार होता. ह्याच मार्गाने ५वा पर्यंत जेजुरीची शीव गाठली. वाटेत एका शिक्षिकेची भेट झाली. आम्हास केळकर वाड्यात त्या पोहचविणार होत्या अट एक होती ;प्रथम चहा त्यांचे कडे घ्यावयाचा. अट आनंदाने मान्य केली. संध्याकाळी ६-३० वा केळकर वाड्यात पोहचलो. उत्स्फूर्त  स्वागताने घरी आल्यासारखे जाणवले .प्रथम चहा ,गप्पा ; फराळ आणि नंतर गरमागरम जेवण याने मन तृप्त झाले. रात्री पाय शेकण्यास गरम पाणी मिळाले .ह्या मायेच्या उबेत रात्री झोप पण छान झाली.


२४-२-९५ शुक्रवार
              सकाळी नेहमी प्रमाणे ५.३०वा  जाग आली.पात:र्विधी आटोपून निघालो.वाटेत न्याहारी करून मोरगाव पर्यंतचे अंतर १० वाजेपर्यंत चालून गेलो. मंदिराबाहेर श्री.देशमुख ह्यांची पेढ्यांचे दुकानात भेट झाली. अष्टविनायकामध्ये हे प्रमुख ठिकाण खरेतर शास्त्राप्रमाणे येथून यात्रा करावी असा संकेत आहे. दर्शनाला गाभाऱ्यात गेलो तेव्हा श्री.यज्ञेश्वर शास्त्री ढेरे ह्यांची भेट झाली. आमच्या पदयात्रेबद्दल  जेव्हा त्यांना समजले; तेव्हा तुम्ही पदयात्रा करणारे पहिलेच दाम्पत्य आहात असे ते म्हणाले. सविस्तर वृत लिहा आणि मला एक प्रत धाडा असे ही सांगितले. ही यात्रा काही नवस म्हणून केली कि काय? असे विचारले! . नाही असे काही नाही! असे सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. माझी तुम्हाला एक विनंती आहे. लेण्याद्री चे दर्शन घेवून यात्रा पूर्ण होताच बसने  डोंबिवलीस परत जावे असे सुचवले . पंढरीचे वारकरी देखील दर्शनानंतर बसने परत जातात . इप्सित पूर्ण झाल्यावर देहदंड नको. पण ग्रामदेवतेचे दर्शन घेवून गृह प्रवेश करा असा सल्ला दिला. त्यांचे विचार आम्हा उभयताना पटले अन तदनुसार आमचा कार्यक्रम योजिला. मंदिराचे ओवरीत विश्रांती घेवून सुपा गाठण्यास  निघालो सुपा येथे राहावयाची सोय होईल किंवा नाही ह्याची खात्री नव्हती . फक्त श्री भगवंत देशमुख हे एकच नावं माहीत होत. दुपारी ३ वा. मोरगाव  सोडलं . सुपा येईपावेतो  पायातील बळ संपत असल्याचे जाणवले . ठराविक अंतर पूर्ण करून देखील गाव दृष्टीस पडत नव्हत . सौ सुनिता हतबल झाली होती ,आता सुप्यात जर सोय होणार नसली तर चौफुला येथे मला बसमध्ये बसवून परत पाठवून द्या, अर्धी यात्रा आणि अर्ध अंतर पूर्ण केल्यावर हे नैराश्य का ? इतक्यात  पठाराच्या घळीत असलेले सुपा दिसले.

पुढील भाग  इथे वाचू शकाल

चिंतामणी - थेऊर --3

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.

१९-२-९५    रविवार
                               सकाळी जाग आली तेंव्हा सकाळचे ७ वाजले होते ,आज पुढचा प्रवास करावा की नाही ह्या विचारात होतो. प्रथम न्याहारी करू, मग बघू असा विचार केला आणि पोटभर नास्ता केला. चहा पोटात जाताच तरतरी आली .सौ.सुनीताला म्हणालो "इथे प.पु. गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे .ते असतील तर त्यांचे आशीर्वाद घेवू ".आश्रमातील शांत प्रसन्न वातावरण, बाजूला खळाळणारा पाण्याचा प्रवाह, मन उल्हसित करून  गेला. ह्या महाराजांची भेट होईल ह्याची खात्री नसते. योग जुळून आला होता. महाराजांचे दर्शन घेतले आशिर्वाद मिळाला. हॉटेलवर परत आलो. दिवसाच्या उजेडात हॉटेल ची भिकार अवस्था पाहून ह्यापेक्षा लोणावळा येथे जावून विश्रांती घ्यावी असे ठरले. कारण अंतर फार कमी म्हणजे  फक्त १५किमि होते. लोणावळ्यात हॉटेल पण चांगली होती ना? आता फक्त ११ वाजले होते तेंव्हा निघावे हेच बरे. टाटा कॉलोनी पासून डांबरी सडक सोडून आड मार्ग घेतला .प्रखर ऊन,उभा चढ पण जंगलची सावली ह्यामुळे लवकरच लोणावळा येथे  पोहचलो .चांगल्या हॉटेल मध्ये विश्राम, स्नान,कपडे धुणे ,बूट मोजे ह्याची दुरुस्ती करून ८ वाजता जेवून घेवून झोपी गेलो.

२०-२-९५ सोमवार
                               सकाळी ५ वा जाग आली सर्व कामे आटोपून बाहेर पडलो. आता सडक सरळ सपाट होती. मध्ये भोजनाचा आस्वाद ,विश्रांती  घेवून तळेगाव येथे ४ वा पोहचलो .इगल फ्लास्क कंपनीच्या शोरूम मधून दिसणारे तळेगावदाभाडेचे दृश्य फारच रमणीय वाटले .सेवानिवृतीनंतर असेच एखादे ठिकाण वास्तव्यासाठी निवडायला हवे! वाटेत जागाखरेदीसाठी.निघालात का ? अशी विचारणा झाली ? कारण हा भाग  विकसित होत होता .३४ कि मी अंतर आज पूर्ण झालं होतं! हॉटेल  मध्ये  आराम केला पुण्यास फोन करून  शिरीष व सौ सुगंधाला उद्या येत असल्याचे कळविले .

२१/२/९५
सकाळी नेहमीप्रमाणे ५ वाजता जाग आली .तयार होऊन पुण्याच्या मार्गाला लागलो. आज भाच्याकडे मुक्काम होणार होता.बाणेर मार्गे औंधला पोहोचलो. आमचे उन्हाने रापलेले चेहेरे व पायाची अवस्था पाहून सुगंधाला तर रडूच आले. ओळखीच्या डॉक्टर कडून पायावर उपचार केले व काही अॅन्टीबायोटीकस् घेतली. घरी फोन करून  खुशाली कळविली. आता २/४ दिवस मुक्काम करून निघा असा आग्रह झाला ,पण "सौ.सुनीताची सुट्टी अपुरी पडेल, तेंव्हा सकाळी पुढे निघणार" हा दृढनिश्चय बोलून दाखवला. शिरीष म्हणाला, मामा तू निघ आता .उरलेली सगळी ठिकाणं स्कूटरच्या टप्प्यात आहेत. काही त्रास  झाला तर कळव ! मी अन् सुगंधा स्कूटरवर येऊ तुम्हाला घ्यायला. मामा "तुझ्याकरिता  उरळीकांचन येथे फार्मर र्इन ह्या हॉटेलमधे जागा राखून ठेवली आहे". त्याची मदत लागल्यास अवश्य कळविण्याचे आश्वासन त्याला दिले .सौ सुनितानेही आता पायात पी .टी.शूज वापरण्याचे ठरविले रात्री लवकर झोपी गेलो.

२२ -२-९५ मंगळवार
                सकाळी ५-३० वाजता घराबाहेर पडलो पुण्याच्या शिवेपर्यंत शिरीष व सुगंधा आले होते.       हडपसर ते लोणी काळभोर प्रवास एका झटक्यात केला. न्याहारी करत असताना थेऊर कडे जाणारा बैलगाडी 
रस्ता माहित करून घेतला. त्या वाटेने दोन्ही बाजूस ऊसाची शेती होती. मधूनच येणारे पाण्याचे पाट व चिखल
इकडेतिकडे उडयामारीत पार करावे लागत होते. ५-६  कि  मी अंतर वाचणार होते.
सकाळी १०-३० चे सुमारास थेऊर येथे पोहचलो. वाटेत गावकरी मंडळी भेटली. चहापान झाले, मग भोजना नंतर जा असा आग्रह झाला. आता आधी दर्शन अन मग भोजन असे सांगताच मंडळीनी परवानगी दिली. सर्व लहानथोर मंडळी पाया पडली गावकरी मंडळीच्या ह्या प्रेमाने आम्हास देखील गहिवरून आले.



            मंदिरात एक विश्वस्त श्री पेंडसे ह्यांची भेट झाली. श्री चिंतामणी चे दर्शन घेतले महाप्रसादाचे     जेवण झाले. अवचित मेहूण म्हणून दक्षिणा कडोसरीस लावली. सौ सुनीताची खणा नारळाने ओटी भरली. नंतर त्यांनी प्रयाग धाम मार्गे उरळीकांचन कडे जाणारा जवळचा मार्ग दाखविला पुन्हा श्रीचे दर्शन घेवून थॆऊरचा निरोप घेतला.सभोवार शेती होती; हिरवळ होती पण छाया देणारे झाड नव्हते. उन्हाचा कडाका जाणवत होता. जेमतेम एक तास झाला असेल, सुनीताचा पित्तप्रकोप उसळून आला एक दोन उलट्या झाल्या अन उरलेल अंतर कसे पार पडणार ह्याची काळजी वाटू लागली. संपूर्ण प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने  जाणवली की सकाळी उल्हास वाटायचा ,दुपारी उन्हाचा त्रास उमेद घालवायचा अन संध्याकाळी मनावर नैराश्याची छाया पसरू लागायची ! आज तर भर दुपारीच अवसान गळालं ह्या पित्त प्रकोपाने  ! हळूहळू प्रयागधाम ला पोहचलो .मुक्तिधाम (नाशिक) सदृश या मंदिरास भेट दिली नाही.

पुढील भाग मोरगाव इथे  वाचू शकाल

Tuesday, 29 May 2012

बल्लाळेश्वर - पाली --2

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.
१७-२-१९९५...

सुधागड जवळ आला होता पण त्याला पूर्ण वळसा घातल्यावरच मंदिरात पोहोचणार होतो . सकाळी निघावयास उशीर झाल्याने सलग २ तासापेक्षा अधिक विश्रांती घेतली नव्हती. संध्याकाळ होताच दिवसभराचे श्रम चांगलेच जाणवू लागले होते .चालणं अशक्य वाटू लागलं होतं. पदयात्रेला सुरवात केल्या पासून हा सगळ्यात अधिक अंतराचा टप्पा होता.सायंकाळी फिरावयास बाहेर पडलेली मंडळी दिसू लागली होती. त्यांच्या कडून मंदिर ३-४ किमी दूर असल्याचे समजले अन पुलाच्या कट्ट्यावर बसकण घेतली. पुन्हा धीराने  मनाला उभारी दिली अन नेटाने पुढे निघालो. तेथील शाळेतील एक शिक्षक भेटले. त्यांचे बरोबर बोलत हे अंतर पार करून श्री धुंडीराजाचे मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात गेलो .थंडगार फरसबंदीवर पाय पसरून बसताच शीण कमी होत असल्याचे जाणवले .आमच्या पदयात्रेचे प्रयोजन सांगताच राहण्याची जेवण्याची सर्व सोय उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी मान्य केली . पुढील १ तासात स्नानकरून देव दर्शन घेतले आणि भोजन करून मंदिरात दिलेल्या खोलीत गेलो शरीर ठणकत असल्याचे जाणवत होते, झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती ! उद्या संकष्टी आहे. परत इतकं अंतर चालवायचे आहे; जमेल का ? विचार करून मन थकलं अन् कधी झोप लागली ते कळले नाही.


१८-२-१९९५ शनिवार
                     नेहमीप्रमाणे  सकाळी ५ वा जाग आली सर्व अष्टविनायकांचे मंदिराजवळ सुलभ शौचालयाची व स्नानगृहाची सोय मुंबई महानगर पालिकेच्या सौजन्याने केलेली आहे. पूर्वी ही  सोय नव्हती तेंव्हा फार त्रास व्हावयाचा .चहापाणी देवदर्शन पूर्ण होई पर्यंत ७-३० वाजले होते.  मनाला आणि शरीराला  तयार केले आणि पालीचा निरोप घेतला .वाटेत चि. सौ .सुषमाला फोन केला खुशाली कळवली. एक तासात रेसल कंपनी च्या व्दारी पोहचलो न्याहारी झाली अन पुढे निघालो .पेडलीच्या जवळपास आलो. एक इसम घाई घाईने सायकलवरून आला आणि पायउतार झाला  अन म्हणाला आप कौन है? कहाँ जा रहे हो ? त्याच्या फाटक्या शरीराकडे पाहून ह्याचे पासून काही धोका होईल असे वाटले नाही. त्याचे पेक्षा आवाज चढवून आणि हातामध्ये असलेला २ फुटाचा टोर्च सरसावून मी जोशात विचारले आप कौन है ? क्या चाहते हो ? माझ्या हॉवरसॅककडे पाहत तो म्हणाला" वो लोग कहते है कि आप हिंग बेचते है". त्याला म्हटलं  अरे भाई आपकी  कुछ गलतफहमी हो गई है ? हम् हिंग  बेचते नही, हिंग लगाते है ! मराठीमध्ये शेंडी लावणे  ह्या प्रकारास हिंदी मधे हिंग लगाना असे संबोधले जाते. त्याच्या पाठीवर थोपटून इतरांनी त्याचा कसा मामा बनवला ते सांगितले.

माझ्या वाढलेल्या दाढीवर हाथ फिरवीत सौ .ला म्हणालो "हा माझ्या दाढीचा परिणाम असावा". मध्ये चहापानाचा कार्यक्रम झाला अन् कानसळ खेडे ओलांडून ३-४ किमी पुढे आलो असू, खणलेल्या सडकेमुळे वाहनांची कोंडी झाली होती. बाजूला झाडाच्या सावलीत विसावलो. इतक्यात एक जीप थांबली आणि कोणीतरी हाक मारत असल्याचे जाणवले. त्या जीप चालकाचा गैरसमज दूर करावा म्हणून गाडीकडे जावू लागलो तो आतून शिव्यांचा भडीमार सुरु झाला होता. कोण हा धटिंगण?
हे बघण्यास आत डोकावलो तर तो माझा वायुसेनेतील व डोंबिवलीत राहणारा मित्र श्री. कदम निघाला गेल्या संपूर्ण एक वर्षात तोंड न दाखवल्याने शिव्या घालत होता .मुकाट्याने गाडीत बसा. कुठे निघालात ह्या वेळेला ?काही बोलण्या पूर्वी तो बाहेर आला न दोघांच्या सॅक गाडीत टाकल्या पण जेंव्हा आमच्या पदयात्रेची कहाणी ऐकवली तेंव्हा तो खुष झाला. म्हणाला" मला माहित आहे तुझं डोकं अस काहीतरी नक्की ठरवत असणार. तूझा उपक्रम स्तुत्य आहे .तू नक्कीच पार पाडणार. ह्याच रस्त्यावर मी एक फार्महौस विकत घेतले आहे तिथे चल,ते बघ ,जेवण कर मग मी तुला इथे आणून सोडतो .त्याच्या फार्महौसच्या अन्नावर माझे नाव लिहिलेले असावे.! ह्या प्रकाराने मुक्कामावर पोहचण्यास उशीर होणार होता.

मध्ये पेडली येथे बोरं विकत घेतली. कारगावात राहणाऱ्या सौ .फुलवंती सकपाळ ह्या काल भेटलेल्या बाईकडे चहाचे निमंत्रण होते ना! बाई अजून भाजी विकून परतलेल्या नव्हत्या .तिच्या लहानग्या कडे निरोप ठेवला आणि खोपोलीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. एव्हाना २०-२५ किमी चालून झाले होते. उन्हाचा ताप अन प्रवासाचा शीण जाणवत होता. कसंही करून अंधार पडण्यापूर्वी जंगलातून बाहेर पडावयाचे होते. सौ .सुनीताचे पायावर आलेले फोड त्रास देत होते पुढचा एक तास तरी गती अशीच ठेवणे जरूर होते .आता एकच उपाय; जय गजानन! श्री गजानन! असे उच्चारण करत मार्गी चालणे . मंत्राबरोबर गती वाढत गेली अन जंगल पार झाले. खोपोलीचा रस्ता रहदारीचा होता व सडकेवर दिवेही होते.

पाली फाट्यावर पोहचण्यास  ७-७:३० झाले. सौ. फारच थकून गेली होती. पोटामध्ये दुपारपासून  अन्नाचा कणपण गेला नव्हता. चतुर्थीचा  उपास फार कडक झाला होता, शरीर  थकलं होतं .संध्याकाळ फार उदासवाणी भासत होती. खरच हे अवघड कार्य आपल्याने पूर्ण  होणार कि नाही ही चिंता वाटू लागली होती .दररोज ३०-३२ किमी हे अंतर झेपणार कि नाही ?प्रवास एक महिना आधी सुरु करावयास हवा होता कि काय ?पायामध्ये बूट घालून चालण्याचा अधिक सराव करावयास हवा होता काय ? इत्यादी प्रश्न  भेडसावू लागले होते ?काय गरज होती ह्या पायापिटीची ?ह्यापासून आनंद होण्या पेक्षा दुख:च अधिक होणार कि काय असे वाटू लागले! निराशामय विचारांचा मनात कल्लोळ झाला .दोघांनी निघण्यात चूक केली की काय ?  असे वाटू लागले .४-५ जणांचा समावेश करून घ्यावयास हवा होता ! टपरीवर चहा घेतला आणि उरलेलं ४-५ किमी चे अंतर २ तासात कसेबसे पूर्ण केले. एका कट्ट्यावर समान ठेवले रिक्षा केली आणि एक हॉटेलमधे रूम घेतली. सुनीताने रूम मध्ये जाताच पायाचे फोड पंक्चर केले. आता पायाची आग वाढली. तिच्यासाठी अँटीबाओटीक गोळ्या व पुनर्जल आदि औषधॆ घेवून आलो. जेवण घेवून रूमवर आलो .पोटामध्ये  अन्न जाताच जरा बरे वाटले पाण्यात पाय ठेवून बरे वाटले, आग कमी झाली . मला चटकन झोप लागली पण ती ३-३० पर्यंत तळमळत होती.

पुढील भाग - थेऊर ; इथे वाचता येईल.

Friday, 11 May 2012

अष्टविनायकाची पदयात्रा - 1

प्रवास हा एक जीवन समृद्ध करणारा , जाणीव विशाल करणारा,  निरोगी छंद आहे .
अनुभवात भर टाकणारा हा छंद तरुणपणा पासूनच जोपासायला हवा. मुळात प्रत्येका मध्ये ही आवड असतेच, अगदी तान्हे मुल सुद्धा कुणाबरोबरही "भूर" जायला हपापलेले असते.  त्या प्रवृत्ती ची जोपासना वाह्यला हवी.  जेंव्हा जेंव्हा  अशी संधी प्राप्त होईल तेंव्हा तेंव्हा ह्या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा.






पदयात्रा प्रारंभ

१५ फेब ९५
आज माघी पौर्णिमा सकाळी ५:१५ वाजता अष्टविनायक यात्रे साठी प्रस्थान ठेवले. २०-२५ दिवसांची सुनिता ची गैर हजेरी होणार होती म्हणून शाळा घर , योग विद्या धाम चाचणी परीक्षे चे पेपर तपासणे इत्यादी कामे व्हायची होती. दि. १४ ची रात्र जवळ जवळ जागूनच काढली म्हणा न !रात्रौ १ वाजता अंथरुणावर अंग टाकले तोच सकाळी ४ चा गजर चाबका सारखा कडाडला. धडपडत उठलो. प्रातर्विधी आटोपले , पूजा केली आणि कपडे चढवले. अरेच्या ! हे सॅकचे खोगीर राहिलेच की ! दोन्ही सॅकचे वजन केले, ५ व ७ किलो भरले . हे वजन घेऊन चालायचे होतं.

कमीत कमी पण आवश्यक वस्तूच बरोबर होत्या. ह्या वजनात कपात करणे अश्यक्य होते.
निघतांना चि. सौ सुषमा घरीच होती. तिने आईला प्रेमाने निरोप दिला. चि. समीर मात्र फारच भावनावश झाला होता . आईच्या पायी डोई ठेऊन त्याने अश्रूंना वाट करून दिली.
माझ्या पदयात्रेच्या विचारांची सदोदित आठवण तोच करून देत असे. शिवाय "बाबा ! तुम्ही नुकतेच सेवा निवृत्त झाला आहात , ताज्या दमाने ही यात्रा लवकर पूर्ण करा , आणखीन १ -२ वर्ष घालवलीत तर मग जड जाईल"  ही त्याचीच सूचना. आणि आता प्रत्यक्षात वेळ येताच तो गहिवरून गेला होता. " बाबा , आई ला सांभाळा आणि शक्य तिथून खुशाली कळवत जा ".

हा प्रचंड प्रवासाचा बेत आपल्या डोघांना पेलवणार आहे का? मन साशंक झालं होतं. ५-२५ वाजले होते तेंव्हा आता उशीर नको .घरच्या गजाननाला वंदन करून घराबाहेर पडलो. डोंबिवली ते शीळफाटा दरम्यान कुठेही मैलाचा दगड नव्हता, पण हे अंतर साधारणपणे १३-१४ कि मी आहे हे माहित होते .सकाळची प्रसन्न वेळ पौर्णिमेचा गारवा शांत वातावरण ह्यामुळे मन आनंदित झालं होतं. गतीपण चांगलीच होती. ६-१५ ला मानपाडा रोड सोडून खिडकाळीस जाण्यास वळलो.

७ वाजता खिडकाळीस पोहचलो. सौ सुनीताने शंका काढली "अहो !गणपतरावांचे दर्शनास जाण्या पूर्वी शंकररावांचे दर्शन घेणे जरुरीचे आहे ना". सगळं कसं नियमानुसार झालं पाहिजे . ७-३० वाजेपावेतो शीळफाटा गाठला .सकाळी घेतलेला चहा ह्यावेळेपावेतो जिरून गेला होता. गाडीला पेट्रोलची गरज होती, चहा घेण्या मध्ये १५-२० मिनिटे गेली .चहा काढ्या सारखा होता .हळूहळू हि व्यसनं सोडायला हवी .देवदर्शनाने उपरती झाली कि काय ?आता हायवे (NH4)वरून आमची पैदल गाडी जोशात निघाली होती.

तेवढयात "अहो पाहिलात का मैलाचा दगड तुम्ही शोधात होतात ना ? सौ. ने बोट दाखविले. ह्यापुढील आमच्या प्रवासातील हा जिवलग साथीदार. दगडावर पनवेल २० कि.मी.असल्याचे सूचित केलेले होते. "आता आपल्याला प्रत्येक कि.मी. ला कितीवेळ लागतो ते पाहता येईलना ?" इति सौ. माझं अनुमोदन ! पुढचे १०-१२-किमी गेल्यावर आमच्या लक्षात आलेकी १ किमि अंतर कापण्यास आम्हाला साधारणपणे १२ मिनिटे लागतात. अरे वा ! म्हणजे आमच्या गाडीचा वेग ताशी ५ किमी चा आहे .म्हणजे दुपारी १ च्या सुमारास आम्ही पनवेल ला पोहोचणार तर ! हळू हळू तळोजा आलं रेल्वे स्टेशन मग एसटी डेपो मग जकात नाका एव्हाना ऊन चांगलच जाणवू लागलं होतं. गॉगल, टोपी, पाण्याची बाटली अशी एकेक वस्तू बाहेर पडू लागली होती . आत्ता आपण दर २०-२५ मिनिटांनी थांबत जावू या का ? सौ. ची सूचना वजा विनंती. आता चालण्याचा वेग ही मंदावला होतां .मलाही उन्हाचा कडका जाणवू लागला होतां. कळंबोली यार्डात आम्ही पोहचलो होतो २५ ते ३०कि.मि. चा टप्पा ठरविण्यात आपण काही चूक तर केली नाही ना ?

झाडाच्या सावलीत थोडा विसावा घेवून पोलिस चौकी पर्यंत मजल मारली. तिथे थांबलो तो चौकशी सुरु झाली. "कोण? कुठे चाललात, सी.बी. आय ची माणसा आहात कि काय ?". माझ्या युनिफोर्म चे कपडे असे कामाला येतील असे वाटले नव्हते .थोडा वेळ विश्रांती घेवून निघालो आणि मोठया हिमतीने पनवेल थांबा गाठला. लॉज मध्ये शिरलो. अंघोळ केली, भोजन केले आणि विश्रांती घेतली .आजचा ३३ किमी चा प्रवास तर उत्तम पार पडला होतां. आता पुढे १५ दिवस हे दररोजचे रुटीन राहणार आहे.

रात्री पाय शेकायला गरम पाण्या ची सोय होऊ शकेल का ? आमच्या पदभ्रमणा बद्दल जेव्हा लॉजच्या मालकाला समजलं तेंव्हा फारच आश्चर्यचकित झाला. 'ग्राहकांचं समाधान हाच आमचा फायदा ' हे सिद्ध करून दिले त्याने. रात्री १०:३० ला फोनेवरून पाणी मिळाल्याची खात्री त्याने करून घेतली. पायांची निट काळजी घेऊन ११ वाजता निद्राधीन झालो.

१६-२-१९९५
सकाळी ३-३० ला जाग आली. लवकर निघायचे म्हणून तयारीला लागलो तेंव्हा लक्षात आलं कि दाढी करावयाचे सामान व टूथपेस्ट घेण्याचे साफ विसरलो आहोत. सकाळी ४-४५ वा हॉटेलच्या बाहेर पडलो .थंडी बऱ्यापैकी जाणवत होती .थंडगार बोचणारे वारे अन् ठणकणारे शरीर सोबत घेवून आता अंतर पार करावयाचे होते मनाची हिमंत बांधली आणि झपझप पावलांना गती दिली. पण भरधाव वाहतूक अन् खणून ठेवालेला रस्ता ह्यामुळे आमची गती जेमतेम ४ कि.मी. झाली होती. सडकेवरून येणारा प्रत्येक ट्रक आणि टँकर हवेचा प्रचंड झोत आमच्यावर फेकून आमची गती कमी करायचा, शिवाय त्यांचा प्रखर प्रकाश आमच्या डोळ्यांना त्रास देवून जायचा. डाव्या बाजूने चालले तर मागून येणाऱ्या गाडीची भीती आणि उजव्या बाजूने चालले तर गाडीच्या धुराचा त्रास. शेवटी उजव्या बाजूने चालण्याचे ठरवले .पहिला थांबा २ तासांनी घेतला. गुरुवारचा उपास जाणवू लागला होता तेंव्हा 'चौक' ह्या गावी सुनिता साठी फलाहार व माझ्यासाठी खास कांदाभजी, असा नास्ता झाला.

हळूहळू खालापूर जवळ केलं. ह्या आधी गावातून घेतलेला शॉर्टकट फायद्याचा ठरला होता. दुपारी २ चे सुमारास एका ढाब्यावर जेवण केले . महड फाट्यावर पोहचण्यास २:४५ झाले. महडला जाणारी डांबरी सडक दिसू लागली . एका गावकऱ्यास विचारले कि जवळचा रस्ता कोणता त्याने शेतातून जाणारी एक पाय वाट दाखवली आणि सांगितले कि तुम्ही अगदी मंदिराजवळ पोहोचाल ३:३० ला आम्ही वरदविनायकाच्या मंदिरात पोहचलो. मंदिरात श्री .देशमुख ह्यांची भेट झाली आम्ही ही यात्रा चालत पूर्ण करण्याचा आमचा मनोरथ त्यांना सांगीतला. त्यांना फार कौतुक वाटले. सर्व सोय व्हावी म्हणून आमची सोय श्री .कोशे ह्यांच्या घरी केली. चहा झाला. विहिरीस भरपूर पाणी अंघोळ कपडे धुणे वाळवून पुन्हा भरून घेणे ही कामे आटोपली थोडी विश्रांती घेवून ६-३० ला मंदिरात जावून बसलो. सायंकाळची आरती झाली. नंतर थोडा फराळ करून झोपी गेलो. निजण्यापूर्वी थोडी पायांची निगा केली.

१७-२-९५
शुक्रवार सकाळी ५-३० वाजता अंघोळ करून तयार झालो. मंदिरात जाऊन देवदर्शन करून आलो. श्री .कोशे गावाच्या शिवेपर्यंत निरोप देण्यास येणार होते. जाण्याचा मार्ग बांधावरून असल्याने थोडे उजाडण्याची वाट बघावी लागणार होती . यात्रा पूर्ण होताच खुशाली कळविण्याची विनंती ते सारखे करीत होते. पाणंद ओलांडून मोडका पूल पार केला आणि खोपोली-अलिबाग रस्त्याला लागलो. इथेच एक विठ्ठल मंदिर आहे त्याला प्रती पंढपूर म्हणतात .ह्याचा रस्त्याने पुढे ५ कि.मी. पार केल्यावर पाली फाटा लागला. अलिबाग रस्ता सरळ पुढे गेला. आम्हाला कारगाव मार्गाने जायचे होते. रस्ता छान होता दोन्ही बाजूस मोठाले वृक्ष होते. अधूनमधून कारखानेही दिसत होते. कारगावला नास्ता केला. येथून पुढे थोडा घाटाचा रस्ता होता. सडकेचे काम सुरु होते. आजूबाजूस जंगल होते .कामगार मंडळी भेटत होती. इतक्यात कुणीतरी मागून हाक मारत आमच्या कडे धावत येत होतं. एक खेडूत स्त्री आमच्या मागे धावत आली आणि म्हणाली तुम्ही पुढे कुठे निघालात, बसचा थांबा तर मागे राहिला. पण आम्ही जेंव्हा तिला आमचा पाई चालत जाण्याचा इरादा सांगितला तेंव्हा तिला नवल वाटले. तिची उत्सुकता ओसंडून वाहत होती. ती धरणग्रस्त महिला असून अहिरवाडी येथे राहत होती तिचे नाव होते फुलवंती श्रीरंग सकपाळ . भाजी विकून ती संसाराला हातभार लावीत होती . तिच्या गावा पर्यंत वेळ छान गेला. चहा घेण्याचा आग्रह झला पण परतीच्या प्रवासात तो घेऊ असे आश्वासन देऊन पुढे निघालो. सौ.सुनिता आतापावेतो वापरत असलेल्या चपलांमुळे पायाला फोड आले होते. त्यावर Band Aid चा इलाज करून घेण्यास झाडाच्या सावलीत थोडे थांबलो. इतक्यात आम्हाला ओलांडून पुढे गेलेल्या तीन कार एकमेकांवर आपटल्यामुळे प्रचंड आवाज झाला. समोरून येणाऱ्या बैलगाडीचे बैल उधळेले अन् त्यामुळे समोरच्या कार चालकाने ब्रेक लावले. सुरक्षित अंतर न ठेवल्याने मागील दोघे त्यावर धडकले .कुणीही जखमी झाले नव्हते. आमच्या मदतीची काही गरज नाही हे पाहून पुढे निघालो . जांभूळपाडा येथे एका टपरीतून बटाटेवड्याचा सूरेख वास आला, आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाणे अशक्य. तेथे समजले की इथून एक पायवाट लोणावळया पर्यंत जाते. अंतर २०-२२ कि.मी. आहे पण वाट फार कठीण आहे. वाटाड्या शिवाय शक्य नाही. उद्या सकाळी एखादा वाटाड्या पाहून थांबावयास सांगून ठेवले. ह्याच गावातले दोन वर्षापूर्वीचे, पुराचे थैमान आठवले. आता येथे सुंदर गणपती मंदिर आहे. सकाळी ठाकर मंडळी दूध व भाजी विकण्यास येतात ते अधिक माहिती देवू शकतील असे कळले. त्यांची भेट घ्यायला हवी.

हळूहळू परली गाव दिसु लागले. इथे एक कलिंगडाचे शेत दिसले. गाडी मध्ये माल भरणे चालू होते ,भाव विचारला पण आम्हा शहरवासीय मंडळीना बघून त्याने अवास्तव किंमत सांगितली .पुढे पेडली गावी चहा ऐवजी काही थंड पेय घ्यावेसे वाटले. म्हणून फ्रूटी घेतलं. ह्या केमिकल पेक्षा निसर्ग पेय घेतले असते तर फार बरे झाले असते असे वाटू लागले. हा विचार अर्थातच सौ.च्या मनातला. पण म्हणतात ना स्वभावो दुरतिक्रमा:. आपापसात वाद घालणे म्हणजे शक्ती क्षय शिवाय आधीच थकलेले शरीर त्यात ही मानसिक मरगळ. एव्हाना २५कि.मि. पेक्षा अधिक अंतर पूर्ण झाले होते .सावलीत थोडी विश्रांती घेतली . प्रवासात वडा-पाव शिवाय काही मिळत नव्हतं आणि अजून बराच अंतर कापावयाचे होते ,रडत खडत पायपीट सुरु केली आणि रायासाल कंपनीचे गेट जवळ केले. कंपनीच्या कॅन्टीन मध्ये चहा फार छान होता. आमच्या प्रवासाचे प्रयोजन समजून तो पैसे घेत नव्हता. तेंव्हा उद्या सकाळचा नास्ता इथेच घेवू असे सांगितले व सुटका करून घेतली.

*************************************
पुढील भाग - बल्लाळेश्वर;  इथे वाचता येईल.