Saturday, 14 July 2012

महागणपती - रांजणगाव - 6

२७-२-९५    सोमवार   (महाशिवरात्र)

सिद्धटेक मुक्कामी रात्री झोप तर छान झाली. लोकांनी केलेल्या कौतुकाने अंगावर मुठभर मांस चढले होते.
६-३० वाजता श्रीं च दर्शन घेतले. भीमेच्या काठावर आलो पण अजून नावाड्याचा पत्ता नव्हता. इतक्यात २-३ गावकरी आले, त्यांनी नाव किनारी आणली. त्यांचे बरोबर वल्ही कशी मारावयाची हे शिकत नदीपार केली. उतरताच सिद्धीविनायाकास हात जोडले अन पावले लिंपणगावाकडे चालू लागली .वडगाव इथे एका मळ्यात उसाचे गुऱ्हाळ चालू होते. सौ. सुनीताला ते बघावयाचे होते. आत शिरलो, मंडळीना रामराम घातला. लगेच विचार पूस झाली,अन रसाची लोटी हाती आली. भट्टी सकाळी २वा.सुरु होते. रात्री १०पर्यंत चालते. एक काहिली रस आटविण्यास ४-५ तास लागतात. गुळाची ढेप कशी पडतात ते ही पाहीले. डोक्यात सामान्य ज्ञानाची,पोटात रसाची,आणि ब्यागमध्ये ताज्या गुळाची भर पडली. नमुना म्हणून! वजन वाढण्याची  भीती ! वडगाव  नंतर अज्नून आलं, वाटेत महादेवाचे दर्शनाला जाणारी मंडळी भेटत होती. आनंदवाडी फाटा ओलांडला आता मुन्डेकर वाडी अन पुढे २ कि.मी. वर लिंपणगाव. प्रवास वेळेनुसार सुरु होता. मुन्डेकर वाडीत शिरताच एक गावकरी म्हणाला त्या वडाच्या झाडाकडे जा. इतक्यात बाजूच्या घराच्या ओसरीतून हाका ऐकू आल्या हे घर म्हणजेच श्री पुरोहिताची सासुरवाडी. ओसरीवर ४ ते ६०  वर्षे वयाची १०-१२ मंडळी उभी होती. स्नान आटोपले अन २-३० वा.फराळाची ताटे समोर आली. ताटभर निरनिराळे उपासाचे पदार्थ पाहून हा थाट काही औरच असल्याचे जाणवले. वर रु ११/- दक्षिणा  मिळाली. अनाहूत पाहुण्याच्या रुपात त्यांना आम्ही शिवपार्वती भासलो असे त्यांनी सांगितले. विश्रांती नंतर हेमाडपंथी शिवमंदिरास जावून आलो. श्री कुलकर्णी (पुरोहिताचे सासरे) ह्यांचा गावात १६ खणी वाडा आहे. १० एकरात  ऊसाची लागवड आहे. गोठ्यात १०-१२ दुभती जनावरे आहेत. रात्री तेथे  थांबण्याचा आग्रह झाला अन आम्हालाही तो मोडता आला नाही. शिवाय २७ किमी इतका प्रवास झाला होताच.
२८-२-९५    मंगळवार
                               श्री.कुलकर्णी  मंडळींचा निरोप घेवून निघालो. ह्या पुढील प्रवास मात्र कोलंबसच्या प्रवासारखा होता. मार्ग अन् प्रदेश ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कुलकर्णी ह्यांच्या शेत जमिनी जवळून जाणाऱ्या कालव्या जवळून ७ किमी गेलो व काष्टी गावी पोहचलो. न्याहारी झाली पुढे निर्वी इथे गावकरी मंडळीशी बोलताना गुनाठ ह्या गावी माझ्या बहिणीकडे मुक्काम करा असे सांगून एकाने पत्र देवून मार्गदर्शन केले. कोरडी नदी ओलांडून तांदळी ह्या गावी पोहचलो. पुढे १०-१२ किमी अंतरात गाव होती पण सडकेच्या बाजूला आंतमध्ये होती. म्हणून चालत  राहिलो. इतक्यात काही गावकरी भेटले त्यांना मार्ग विचारला तेंव्हा आपण रस्ता चुकल्याचे लक्षात आले. कपाळावर हात मारून घेतला. आता काय पर्याय ? त्यांचे कडून इतकेच समजले की दोनच गोष्टी आमच्या हाती आहेत. एक तर मागे १० कि.मी. जावून योग्य मार्ग घेणे किंवा पुढे नाव्हारा फाट्या वरून रांजणगाव गाठावे. पण हे अंतर एक दिवसात पूर्ण होणे शक्य नव्हते. तेंव्हा आन्दलगाव पर्यंत जावे. पण तेथून शिरूर ला जावे. खरे तर शिरूर आमचे  मार्गात नव्हते. पण जवळचे पैसे ही संपले होते. बँकेत जाणे भाग  होते. आलीया भोगाशी. .....दुसर काय? चूक कोणाची? आधी चौकशी का केली नाही? इतका आत्मविश्वास कसा वाटला? दोघा मधील वाद मिटत नव्हता. अंतर कटत होतं. शेवटी ३८ कि.मी. अंतर पूर्ण करून आन्दलगाव गाठलं! बसने शिरूरला गेलो. बँक चे काम झाले. जैन हॉटेलमधे राहिलो.

                         खरंतर  जर आमचा मार्ग बरोबर असता तर लिंपणगाव-रांजणगाव  हे अंतर ४८ कि.मी. होते व ते दोन दिवसात पूर्ण करावयाचे होते. पण आत्ता ६० कि.मी. अंतर पार करावे लागणार होते. म्हणजे १२ किमी. किंवा ३-४ तासांचा जादा प्रवास.

१-३-९५ बुधवार.

शरीराला अन मनाला आता इतकी सवय झाली होती की खोगीर चढवता जसे घोडे फुरफुरू लागते, तसे सॅक पाठीवर घेताच पावलं अष्टविनायकाची वाट चालू लागावयाची. सिद्धटेक नंतर फक्त तीन गणपती राहिले हा विचार मनात आला की यात्रा सिद्ध होणार ह्याची खात्री वाटू लागे. आजचा रस्ता डांबरी असून बाजूस छाया देणारी झाडे होती .रस्ता चुकण्याची भीती नव्हती .कालच्या प्रसंगाची उजळणी पुन्हा एकवार मनाशी झाली. शेवटी त्या एकाट व शिंदी  वनातून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा हा छान रस्ता तर मिळाला ह्यावर समाधान मानून घेतले. वाटेत प्रवासात अनेक जैन श्रावक भेटत होते. ते अनवाणी चालतात व दिवस भरात २०-२५ किमी अंतर पार करतात. आज दिसलेले श्रावक कापडी पादत्राणे वापरत होते. एक तर व्हील खुर्चीतून जात होते.
                                 साधारण ११ वा. रांजणगावला पोहचलो. दर्शन करून एका ढाब्यावर जेवलो. परत मंदिरात आलो. वीज नसल्याने जनरेटर सुरु होता. त्या आवाजात विश्रांती शक्य नव्हती आता १२ किमी पूर्ण करून मलठणला जावयाचे होते. राज मार्ग सोडला आणि शेतीतून पठारावर आलो पठारावर झाडे तर नव्हती पण माणसांची चाहूलही नव्हती. तोंडावर येणारे सूर्य किरण त्रास देत होते .पन्हाळगड ते विशालगडला जाताना लागणारे म्हसाईचे पठार आठवले.


 उजाड भकास माळरान, तळपणारे ऊन, मरगळलेले मन ,ठणकणारे पाय अन पडलेला वारा चालण्याची गती ही वाढेना. हळूहळू अंतर कटत गेलं आणि उतार सुरु झाला. इथे सोनसंगवे नावाचे गाव लागले. गावकरी भेटले. आम्ही डोंबिवलीहून निघाल्याचे सांगताच मंडळी हसू लागली; कारण विचारले तर समजले कि येथील ५-५० जण डोंबिवली येथे राजाजी पथावर राहतात. आंब्याचे दिवसात आंबे, नाहीतर आवळे व इतर  मसाल्याचे पदार्थ विकतात. संध्या छाया पसरू लागताच वारा पण सुटला मलठण जवळ आल्याची चिन्हे दिसू लागली. गावाच्या वेशीत प्रवेश करताच जे गृहस्थ प्रथम दिसले त्यांचे जवळ "गावात रात्रीचे मुक्कामाची काही सोय होईल का?"  ही विचारणा केली. श्री शिंदे ह्यांनी राम मंदिरात सोय होईल असे सांगितले इतकेच नव्हे तर राम मंदिराची वाट दाखवली, गाभाऱ्याची किल्ली दिली आणि रात्री भोजनास घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले .चहापाना नंतर मंदिरात गेलो. ८-८.३० पर्यंत वीज येईल. तेव्हा आराम करा असे म्हणाले .थोडी थकावट दूर करण्यास हातपाय धुतले. जवळच्या मेणबत्या काढल्या त्या पेटवल्या रोषणाई झाली आणि रामरक्षा म्हणावयास सुरवात केली. काही चाहूल लागली म्हणून थांबलो तर ४-५ गावकरी मंडळी आत आली त्यांनी आमचे साठी चहा करून आणला होता. श्री. पांडुरंग शास्त्री  आठवले ह्यांचे स्वाध्याय  मंडळ  इथे आहे. आलेली मंडळी त्यापैकी होती. वीज आली, श्री शिंदे आम्हास भोजनास घेवून गेले. जेवून परत आलो तेंव्हा ही मंडळी आमचे साठी पाय शेकण्यास गरम पाणी घेवून आलेली होती. रात्री थंडी वाजू नये म्हणून काही चादरी देखील त्यांनी दिल्या. त्यांच्या ह्या प्रेमाने आम्ही उभयता भारावून गेलो आणि आमच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले. मानवी स्वभावाचे मनोज्ञ दर्शन आम्हास झाले. रात्री पायाची निगा घेवून गाढ झोपी गेलो.

No comments:

Post a Comment