पदयात्रेची सुरुवात
इथे वाचू शकाल.....
सौ. सुनीताची एक मैत्रीणीचे (भजनी मंडळ ग्रुप मधील) श्री देशमुख हे नातेवाईक. गावाबाहेर शाळेत चौकशी केली. ते नुकतेच घरी गेले असे समजले. त्यांच्या घरी गेलो. ते अजून घरी आले नव्हते. त्याचे दोन भाऊ घरात होते . सौ देशमुख मोरगावला गेल्या होत्या . आम्ही जरी अनाहूत पाहुणे असलो तरी योग्य बडदास्त ठेवली . सौ देशमुख बाईना जेव्हा मोरगावी समजले की मुंबईचे एक जोडपे त्यांच्या घरी सुप्याला गेले आहे तेव्हा त्या तातडीने परत आल्या . ह्या गावी पाण्याचा दुष्काळ आहे .पाण्याची सोय टॅन्करने होते. गावात एक दर्गा आहे त्याला फार मान आहे. एक भुईकोट किल्ला आहे हिंदू व मुसलमान लोक गुण्या गोविंदाने राहतात. तुम्ही ह्या कशाची काळजी करू नका. थकला असाल! आराम करा ! घरच्या गाडीवर टाकी बसविलेली आहे शेतातून पाणी आणले जाते. त्यांच्या बोलण्याने उभारी आली. आम्ही कोण कुठले फक्त यात्रेकरू पण किती मनोभावे व आदराने सेवा करीत होते ते जाणवले . भोजना नंतर शांत झोप आली.
२५-२-९५ शनिवार
सकाळी ५-३० वा. जाग आली. स्नानासाठी गरम पाणी तयार होते .झटपट तयारी केली. देशमुख सरांचा निरोप घेतला. सुपा ते पडवी फाटा हे ६ कि.मी. गेल्यावर, उजवीकडे वळून कुसगाव मार्गे पाटस ,दौंड कडे जाता येते. डावीकडे वळल्यास ५ कि.मी. अंतरावर नारायण बेट हे दत्त संप्रदायाचे ठिकाण आहे. आम्ही पडवी पूर्वी एक पायवाट धरली .३ कि.मी.अंतर वाचले . एका ठिकाणी चांगला चहा मिळाला . प्रवासात दिसून येणाऱ्या पशु पक्षांची माहिती मी सुनीतास पुरवीत होतो. अर्थात मला फार माहिती होती असे नाही पण थोडी अधिक आहे इतकच. आतापावेतो १०-१२ प्रकारचे पक्षी जे शहरांत दिसत नाहीत ते दिसले होते . तेव्हड्यात एक चितळ २०० फुटावरून पळत आले . प्रथम मलाही ते पाळीव असेल असे वाटले .पण आम्ही जवळ जाताच चौखूर उधळून समोरच्या टेकडीवर नाहीसे झाले . आमच्या प्रवासात भेटलेला हा एकमेव वन्य प्राणी. बघता बघता कुसेगाव आले . इथे श्री पांडुरंग शितोळे ह्या निवृत्त सैनिकाची भेट झाली . चहा झाला. आम्ही पाटस कडे निघालो साखर कारखाना दिसत होता . गेटवर छान सावली होती . थोडी विश्रांती घेतली कॅन्टीन मध्ये जेवण मिळेल हे समजले .पण पुढे ५ कि.मी. गेल्यास गावात मनासारखे जेवण घेता येईल म्हणून पुढे निघालो. पाटस येथे छान जेवण मिळाले. दहीपण मिळाले. जेवण घेवून डांबरी सडकेने निघलो मोठ्या वृक्षांची घनदाट छाया होती. सुनिता म्हणाली देखील की "अशी छाया असेल तर दुपारचेही चालता येईल" . पण हे भाग्य कुठलं. ५०० यार्डाचे अंतर गेल्यावर दौंड फाटा आला. पुढे चांगला रस्ता लागेल ह्या आशेने पुढे झालो, पण लक्षात आलं की प्रवासातील हा अत्यंत दुर्धर टप्पा. ११ कि.मी. अंतरात रस्त्याच्याकडेला छाया देणारे एक पण झाड नव्हते . होती ती बाभळीची खुरटी रोप . दूर एका शेतात आंब्याच्या सावलीत शेतकरी कुटुंब विश्रांती घेत होत तिथे पोहचलो. थंडगार पाणी, ओला हरभरा मिळाला. थोडी विश्रांती घेवून डोक्यावर ओले पंचे घेवून मार्गक्रमणा सुरु केली.
दौंड परिसर आता दिसू लागला होता. "दौंड हे गाव गुंडगिरीसाठी प्रसिद्ध आहे , तेव्हा जपून" ही सावधगिरीची सूचना आधीच मिळालेली होती. सावध होतो. गावात समर्थ लॉज हे उतरण्याचे एकमेव ठिकाण. नाहीतर बारामती खेरीज कुठे सोय होणार नव्हती. मिळाली ती खोली घेवून मुक्काम ठोकला. पी .टी शूज खरेदी केले. बुटाला झिजून भोक पडले होते. घरी फोन केला. कपडे धुतले. जेवून झोपी गेलो.
२६-२-९५ रविवार
सकाळी ६ वा.तयार होवून बाहेर पडलो आणि शिरपूरची वाट धरली. उन्हाखेरीज कशाचा त्रास झाला नाही. प्रथम देऊळगाव व नंतर शिरपूर लागलं. दुपारचे १२ वाजत होते. रविवारला जोडून सोमवारची महाशिवरात्रीची सुट्टी होती म्हणून मुंबई, पुणे येथील यात्रा कंपनीच्या बस गाड्या सकाळपासून आल्या होत्या. एका कंपनीची १०० माणसांची जेवणाची तयारी सुरु होती. यात्रेकरू दर्शनासाठी मंदिरात गेले होते. भीमा ओलांडून नावेने जावयाचे होते. आमच्या भोजनाची सोय त्यांच्यामध्येच केली व तेथे मिळत असलेल्या लिंबू सरबताचे २-४ पेले रिचवले. आमच्या पदयात्रेचे वृत त्यांना कळताच, आम्हाला घेराव घातला गेला. प्रश्नोत्तरे झाली. कौतुक झाले .आमच्या मुलाच्या कंपनीतील एक सहकारी आणि मला ओळखणारे एक ,दोन जण भेटले. ४-३० वा .भीमा ओलांडून सिद्धटेक येथे पोहचलो. तिथे असलेल्या धर्मशाळेवजा लॉजमधे एक खोली घेतली. पदयात्री म्हणताच चहा फुकट व खोली भाडे ५०% सूट मिळाली . मंदिरात गेलो . गप्पा सुरु झाल्या. येथील श्री पुरोहित ह्यांनी आम्हा उभयताचे कौतुक केले. ते म्हणाले "माझी सासुरवाडी लिंपणगाव येथे आहे. हे गाव महादेवाचे जागृत स्थान आहे. तुम्हाला ४ किमी वाट वाकडी करावी लागेल इतकेच,तुम्ही फक्त हो म्हणा! तुमची सगळी बडदास्त माझेकडे!" आम्हाला नाही म्हणवले नाही.शेजआरती नंतर मंदिरातून परत आलो.

त्याआधी संध्याकाळी धर्मशाळेत एक लग्नाचा समारंभ होता. मंडळी श्रीगोंदा येथील होती. आमच्या सारखे अनाहुत पाहुणे त्यांना आवश्यक वाटत होते. आम्हाला बरच काही अध्यात्म समजत असा त्यांचा गैरसमज झाला होता. आम्हाला भोजनाचे निमंत्रण होते. अधिक गैरसमज नको म्हणून भोजनास गेलो. नवरदेवास भेट पाकीट दिले. मंडळी फार आनंदित झाली. जेवून बाहेर आलो व एका पुस्तकाचे दुकानात काही तरी चाळत होतो इतक्यात माझे नावाने मोठमोठ्याने कुणीतरी हाक मारत होते. सौ.सुनीताला काही झाले कि काय ही भीती वाटली, आणि मी बिवलकर इथे आहे असे जोरात ओरडलो. एक गृहस्थ आले व मला कडकडून भेटले. तुम्ही अष्टविनायक यात्रा चालत करता आहात हे समजले म्हणून ही गळाभेट. "मी भाऊ बिवलकर, माझी सागर travel नावाची कंपनी आहे". गाडीभर यात्रेकरू त्यांच्या कंपनी बरोबर होते.आजचा हा कितवा गणपती ? . मी म्हणालो "पाचवा ,अजून तीन बाकी आहेत.२/३ प्रवास आम्ही पूर्ण केला अजुन१/३ बाकी आहे. ३७५ किमी झाले आहे १२५ किमी अजून चालवायचे आहे तेंव्हा कसलं अभिनंदन अन कौतुक करता"!
"अरे!! असे म्हणू नका तुमची ही हिम्मत व धडाडी पाहून आम्ही थक्क झालो आहोत.तुमचे पाय धरवायाचे आहेत", ह्या वेळेपावेतो सगळ्यांनी घेरून टाकल होतं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही थकला नसाल तर आणि परवानगी असेल तर ? होकार देताच, प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
१) ही कल्पना कशी व कधी सुचली ?
२) पद यात्रा करण्यची ही पहिलीच वेळ का ?
३)आधी सराव केला होता का?
४)दररोज किती वेळ चालता? किती अंतर पूर्ण करता ?
५)जेवणाचे काय करता ?
६) रात्री कुठे थांबता ? अजून किती दिवस लागतील ?
७)बरोबर किती वजन असते ?
८)प्रवासात त्रास कितपत झाला?
आम्हाला प्रत्येक ठिकाणी ह्याच प्रश्नांनी भंडावलं होतं. त्यामुळे उत्तरे तयार होती. सगळ्या समवेत फोटो झाले.पत्ते, फोन नंबर ह्यांची देवाणघेवाण झाली व मंडळीनी निरोप घेतला.